Skip to main content

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

 शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com


समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली.

वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि वडील बंधूंच्या प्रेरणेतून बापू बालवीर म्हणून या आंदोलनात उतरले.त्यांना वक्तृत्वाची जन्मजात देणगी होती. त्याला निरीक्षण व अभ्यासाची जोड देण्याची त्यांची स्वयंशिस्त होती. त्यांच्या बोलण्यात ,लिहिण्यात आणि वागण्यात ती शिस्त अखेरपर्यंत होती. विचारांवर अधिष्ठान ठेवून जे सातत्य त्यांनी जपले तो त्यांचा खरा मोठेपणा होता. बापूंना ‘ प्रबोधकांचे प्रबोधक ‘ म्हणून जी लोकमान्यता मिळाली होती ती त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून मिळालेली होती.

विद्यार्थी दशेत राष्ट्र सेवा दल ,काँग्रेसचा १९४२ चा लढा, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष ,मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी राजकीय वाटचाल वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी केली. आणीबाणीनंतर अपक्ष पातळीवरील ‘ ‘ समाजवादी प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. आणीबाणी लादली गेल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते.त्यांची मने सैरभैर झाली होती.त्याच बरोबर १९६० नंतरच्या काळात राजकीय पक्षांच्या बांधणीतही कमालीचे दोष दिसू लागले होते. ज्यांच्या सहकार्याने राजकारण करायचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या योग्य प्रबोधनाचा अभाव होता. त्यामुळे समाजजीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.ही पोकळी भरून काढावी व जिज्ञासू कार्यकर्त्यांचे ,समाजाचे प्रबोधन करावे या हेतूने हे अपक्षीय ज्ञानपीठ तयार झाले.

राष्ट्र सेवा दला पासून प्रबोधिनीपर्यंतच्या सर्व प्रवासात प्रत्येक टप्प्यावर बापूंनी स्वतःची अशी एक अमिट मुद्रा उमटवलेली आहे. पक्की वैचारिक बैठक असलेल्या बापूंच्या उक्ती आणि कृतीत फरक नव्हता. ” विचार पेरा कृती उगवेल ,कृती पेरा सवय उगवेल, सवय पेरा चारित्र्य उगवेल आणि चारित्र्य पेरा भविष्य उगवेल ” असे एक वचन आहे. बापूंचा जीवनपट या वचनाला सार्थ ठरविणारा आहे.

समाजवादी प्रबोधिनीला येत्या मे महिन्यात ४७ वर्षे पूर्ण होतील. १९८५ पासून मी बापूंचा एक तरुण सहकारी, त्यांच्या प्रमाणेच एक पूर्णवेळ कार्यकर्ता आणि सर्वार्थाने त्यांचा मदतनीस म्हणूनही अखेरपर्यंत त्यांच्या अतिशय निकट होतो. आज बापूंना जाऊन बारा वर्षे झाल्यानंतरही त्यांच्याबरोबरच्या त्या सव्वीस वर्षांच्या वाटचालीतील क्षण न क्षण माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे.कारण तो माझ्या अखंड तारुण्याचा कालखंड आहे.प्रबोधिनीच्या उभारणीसाठी, विविध उपक्रमांची आखणी करण्यासाठी बापूनी प्रचंड कष्ट घेतले. धावपळ केली. त्या कष्टांचा मी सहकारी साक्षीदार आहे.अर्थात त्या धावपळीने दमछाक न करता नेहमीच अजून गतीने काम केले पाहिजे हेच सांगितले. मी विद्यार्थिदशेत असताना समाजवादी प्रबोधिनीच्या कामात पूर्णवेळ पूर्णतः झोकून देण्याची इच्छा मनात प्रज्वलित करण्यापासून ते गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळण्याच्या अनेक संधी चालत येऊनही ते तथाकथित स्थैर्य नाकारण्याची क्षमता माझ्यात निर्माण करण्यापर्यंत आणि माझ्यातील लेखक, अभ्यासक, वक्ता, संपादक घडवण्यापासून ते त्यांच्या हयातीतच सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रबोधिनीचे काम पुढे चालवण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यापर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे शिल्पकार शांतारामबापूच होते.

२००२ साली शांतारामबापूंचा अमृतमहोत्सव झाला. त्या दिवसापासून शांतारामबापूंनी समाजवादी प्रबोधिनीची सर्वप्रकारची संपूर्ण धुरा माझ्यावर सोपविली आणि दैनंदिन कामातून ते पूर्णतः बाजूला झाले.आज याही गोष्टीला बावीस वर्षे होत आली आहेत.माझी संस्थेच्या एकूण कामातली अडतीस वर्षे, त्यातील सर्व प्रकारच्या संपूर्ण जबाबदारीची बावीस वर्षे आणि बापूंशिवायची बारा वर्षे हा प्रदीर्घ पट उलगडतांना माझे मलाही अचंबित व्हायला होते.आज बापूंचा बारावा स्मृतिदिन होत असताना ही वाटचाल अधिक ऊर्मीने करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे यात शंका नाही.

अदम्य जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती ही बापूंच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. नाहीतर एरवी क्षयापासून चे हृदय विकारापर्यंतच्या रोगांनी आणि अपचनापासून ते धापेच्या तक्रारी शरीरात तब्बल चाळीस वर्षे ठाण मांडून बसलेल्या असतानाही त्यांचे सातत्यपूर्ण काम स्तिमित करणार होते. बापूंनी वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून प्रचंड प्रबोधन केले .एक वचन आहे की, ” विद्वानाची शाई ही हुतात्म्याच्या रक्ताहून अधिक पवित्र असते “.बापूंनी तर स्वातंत्र्य आंदोलनात हुतात्म्यांच्या रक्ताचे महत्व जाणले होते. कष्टकऱ्यांचे पक्षीय आंदोलन करतानाही त्यांनी त्याचे महत्त्व ओळखले होते. आणि त्यांचे लेखन हे एका विद्वानाचे विचारवंतांचे चिंतनशील लेखन होते.

प्रबोधनाच्या कामाला संस्थात्मक रूप देण्यामागे बापूंची पक्की भुमिका होती.समाज प्रबोधन ही समाजजीवनात सातत्याने व नियमित चालवणे आवश्यक असणारी प्रक्रिया आहे.कोणत्याही प्रक्रियेमागे सैद्धांतिक आधार आणि मार्गदर्शन तसेच नियंत्रणे असल्याशिवाय ती उपयुक्त,फलदायी व यशस्वी ठरत नाही. व्यवहारवादाच्या नावाखाली हे नाकारण्याचा प्रयत्न ही दुसऱ्या बाजूला सुरू असतो. अर्थात, विकासप्रक्रियेतील एक अंतर्विरोध असे समजून त्याचेही निराकरण करावे लागते.हे निराकरण करताना ,प्रबोधनाकरता विषयांची व क्षेत्रांची निवड करताना अग्रक्रमांची निवड जेवढी अचूक केली जाते, तेवढे विकासप्रक्रियेचे काम परिणामकारकपणे पार पडते.हे सूत्र आधारभूत धरूनच समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली.त्यानुसार प्रबोधनाची कार्यपद्धती तयार केली.

समाज प्रबोधनामध्ये लोकजागृती ही परिणामाच्या टप्प्यावरील परिणती मानावी लागेल. कार्यकर्त्यांची सैद्धांतिक भूमिकेशी बांधिलकी आणि जनजीवनाच्या प्रत्यक्ष अवस्थेत ती भूमिका पोहोचविणे व रुजविणे यासाठी निवडावयाची व अवलंबावयाची कार्यपद्धती ठरवणे आणि त्यानुसार प्रत्यक्ष कार्यरत राहणे हा संस्थेच्या कार्याचा मुख्य असावा लागतो, असे मानून अशा कार्यकर्त्यांचे व जिज्ञासुंचे संघटन करण्याला अग्रक्रम देण्यात आले.व्यक्तिगत संपर्क,विचार विनिमय आणि सोयीच्या वेळापत्रकानुसार कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. त्यामध्ये व्यक्तिगत गाठीभेटी, चर्चा यांना गरजेप्रमाणे वाव व प्राधान्यही ठेवण्यात आले.त्याचबरोबर साप्ताहिक ,पाक्षिक अशा नियमित बैठका,प्रचलित प्रश्नांवरील सततची व्याख्याने ,परिसंवाद ,चर्चासत्रे, वार्षिक व्याख्यानमाला ,वाचनालयांची उभारणी असे अनेक उपक्रम संस्थात्मक प्रबोधनाला उपयुक्त ठरतात हे गेल्या ४६ वर्षाच्या समाजवादी प्रबोधिनीच्या वाटचालीतून दिसून आले आहे. त्यामागे बापूंचा द्रष्टेपणा महत्वाचा होता.

प्रबोधनाचे एक प्रभावी व परिणामकारक माध्यम म्हणून प्रबोधिनीने पहिल्यापासूनच पुस्तिका ,पुस्तके ‘ मुद्रण खर्चात व पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना ‘ या वैशिष्ट्यांसह प्रकाशित केली. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून जानेवारी १९९० पासून ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” हे मासिक सुरू केले.गेली ३४ वर्षे अतिशय नियमितपणे हे मासिक सुरू आहे. गेल्या ४५ वर्षात समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अंदाजे सत्तावीस हजारांहून अधिक छापील पृष्ठांचे प्रबोधन साहित्य, सकस वैचारिक शिदोरी दिली गेली आहे.महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठानी या नियतकालिकाला ‘ मान्यताप्राप्त नियतकालिक ‘ म्हणून मान्यता दिलेली आहे. या मासिकावर मुंबई विद्यापीठात पीएचडी व एम.फिल. हे प्रबंध सादर होऊन त्यांना पदव्याही जाहीर झाल्या आहेत.गेली वीस वर्षे मी या मासिकाचा ‘ संपादक ‘आहे.या काळात मी साडेतीन हजारांवर छापील पृष्ठांचे ‘संपादकीय ‘ लिहिले आहे.अर्थात पहिल्या अंकापासूनच मी यात सक्रिय आहेच.ही माझ्या अभिमानाची बाब आहे. हे शांतारामबापू यांच्यामुळे आहे याची नम्र जाणीव आज त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनी आहे.

तत्पूर्वी १९८४ साली ‘प्रबोधन वाचनालय ‘ समाजवादी प्रबोधिनीने स्थापन केले. आज या ग्रंथालयात साहित्याच्या सर्व प्रकारची ३१ हजार पुस्तके आहेत. त्यामध्ये समृद्ध असा संदर्भ विभाग आहे.तीन हजारावर पुस्तकांचा स्वतंत्र बाल विभाग आहे. शंभरावर दैनिके – नियतकालिके यांनी समृद्ध असा मोफत वाचन विभागही आहे.याचा लाभ दररोज शेकडो वाचक घेत असतात.याशिवाय इतर अनेक सातत्यपूर्ण उपक्रम सुरू असतातच. अभ्यासिका उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत.

भारताचा प्रदिर्घ स्वातंत्र्यलढा समाजवादी समाजरचनेच्या दिशेने वाटचाल करत होता. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील सरनाम्यात संपूर्ण स्वातंत्र्य ,लोकांचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संघराज्यीय एकात्मता या पायाभूत संकल्पनांच्या आधारावर समाजवादी समाजरचनेचा इमला उभारण्याचे आपण आग्रहपूर्वक जाहीर केलेले आहे. भारतीय परिस्थितीचे, विशेषतः या समाजजीवनातील विकसनशील व गतिशील अंगोपांगांचे शास्त्रीय व वास्तव मूल्यमापन करून समाजवादी समाजरचनेच्या दिशेने आपले परिवर्तनाचे प्रयत्न जाणीवपूर्वक चालवणे ,हे ते उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग आहे.यासाठी या पायाभूत संकल्पनांची आणि वैज्ञानिक समाजवादाची जाण असलेले आणि तशी मानसिकता तयार झालेले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात निर्माण करणे हा प्रबोधिनीचा मुख्य उद्देश आहे. ही बापूंची धारणा होती.त्यांच्याबरोबर पाव शतकांहून अधिक काळ एकत्र काम केल्याने बरेच काही शिकता आले.

प्रबोधकांचे प्रबोधक असलेले बापू वयाच्या ८५ व्या वर्षी शनिवार ता. ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. अनारोग्याने ग्रासलेले आणि कृश झालेले आपले शरीर कोणत्याही कर्मकांडाविना दहन करावे आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून मीच अग्नी द्यावा ही इच्छा त्यांनी अनेकदा व अनेकांशी व्यक्त केली होती.आपण त्या इच्छेचा सन्मान केला.

गेल्या बारा वर्षाच्या काळावर नजर टाकली तर हा काळ सैद्धांतिक प्रबोधनाच्या अत्यंत गरजेचा आहे यात शंका नाही.पण त्याचवेळी या काळाने फार मोठी आव्हानेही उभी केली आहेत.भारतीय दर्शन परंपरा,भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्याचा आशय ,राज्यघटनेचे तत्वज्ञान या सगळ्यांवरच अत्यंत वेगाने व तीव्रतेने हल्ले होत आहेत. हे हल्ले करणारे दिवसेंदिवस अधिक संघटित होत आहेत, येन केन प्रकारेण सत्ता मिळवत आहेत, स्थिर व शिरजोर होत आहेत. दुसरीकडे त्यांच्या प्रतिगामीत्वाला विरोध करणारे व स्वतःला पुरोगामी मानणारे आपसातच लढत आहेत.आम्ही सारे एक आहोत म्हणणारेच जेंव्हा व्यक्तिवादाने किंवा व्यक्तिद्वेषाने पछाडलेले असतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या संस्थेवर, संघटनेवर होत नसतो तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवर होत असतो.समाजाचा विश्वास गमावला जात असतो. याचे भान ठेवणे ही काळाची गरज आहे.

प्रबोधन,परिवर्तन संथपणे पण मूव्हमेंटनेच होत असते.इव्हेंटने नव्हे याचे भान आपण सर्वांनी ठेवले नाही तर खरंच येणारा काळ खरंच माफ करणार नाही. पक्के वैचारिक अधिष्ठान असलेली आकाशाच्या उंचीची माणसे आता कमी होत आहेत.आणि खुज्यांची चलती आहे. हे वेळेस थांबले नाही तर केवळ पूर्वजांच्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करत राहण्याची आणि दुसरीकडे विचार कमजोर होऊन झालेला पाहण्याची अधिक भयावह वेळ येऊ शकते. पुरोगामी चळवळीने भारतीय संविधानाचे तत्वज्ञान हा विषय प्रबोधनाचा म्हणून अग्रक्रमाने घेतला पाहिजे हे ४६ वर्षांपूर्वी सर्वप्रथम ओळखणारे व ते समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून कृतीत आणणारे शांतारामबापूच होते.आणि दीड दशकांपूर्वी अण्णा हजारे यांचा उदय झालेले व राजकीय पक्षांना नावे ठेवत सुरू केलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे तद्दन राजकीय आंदोलन आहे, ते अशास्त्रीय आहे, तुमचा अंतस्थ हेतू शुद्ध नाही हे शांतारामबापूंनी त्यावेळी खुद्द अण्णा हजारे यांना सुनावले होते.मी त्याचा साक्षीदार आहे.अण्णांची जाग आणि झोप सोयीनुसार असते हे गेल्या अनेक वर्षात दिसून आले.त्यांची सोयीनुसार भाषा कोणत्या गांधीवादात व नीतिमत्तेत बसते हे त्यांनी सांगितले नाही तरी आपण ओळखले पाहिजे.पुरोगामी ,प्रबोधनाच्या चळवळीतील प्रत्येकाने खऱ्या अर्थाने कृतिशील पद्धतीने विवेकनिष्ठ,विचारनिष्ठ झालेच पाहिजे हा शांतारामबापूंचा आग्रह त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनी तीव्रतेने पुन्हा पुन्हा ध्यानात घेतला पाहिजे व कृतीत आणला पाहिजे ही काळाची मागणी आहे.शांतारामबापूंच्या निधनानंतर प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण दशकभराची वाटचाल केली. एन.डी.सरही गेले.पाठोपाठ जे. एफ.पाटील सरही गेले.समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांतील सर्व शिलेदार आपण गमावले आहे.अशावेळी आपले संस्थात्मक लोकप्रबोधनाचे काम आपण सर्वार्थाने विकसित करण्यासाठी आपल्या सर्वांगिण भागीदारीसह कटिबद्ध राहणे हीच त्यांना खरीआदरांजली ठरेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

Popular Posts

जयंत महापात्रा :घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी

पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी  (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे  जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू झाला. १९४९ ते १९८६ या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले.जयंत महापात्रानी वयाच्या चाळीशीत कवितेचा हात धरला. आणि पुढची अर्धशतकाहून अधिक काळ कवितेसोबत समृद्ध वाटचाल केली. उडिया भाषेतील सात, इंग्रजी भाषेतील वीस असे तब्बल २७ काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांनी ललित लेखनही केले होते.लघु कथा लिहिल्या. उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला होता.'चंद्रभागा ' या सकस साहित्य चर्चा करणाऱ्या नियतकालिकाचे ते संपादकही होते.जयंत महापात्रांना सार्क साहित्य पुरस्काराबरोबर देशविदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले होते.२००९ सा...

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल

 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे. :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी  येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५  वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.  जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्...

बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती

  बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती पुणे न्यूज एक्सप्रेस : बेडकीहाळ :-दूधगंगा नदीच्या काठावर वसलेले बेडकीहाळ हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखले जाते. दूधगंगा नदीचे बारमाही वाहणारे पाणी, सुपीक जमीन आणि उसासारख्या नगदी पिकाने हा परिसर सधन समजला जातो. तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात बेडकीहाळ अग्रेसर मानले जाते. बेडकीहाळ गावचे भौगोलिक स्थान पाहता बेळगाव, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली, हुपरी, इचलकरंजी अशा कर्नाटक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते आणि वाहतुकीची सोय यामुळे या परिसराचा झपाट्याने कायापालट होताना दिसतो आहे. या परिसरातील पहिले हायस्कूल 1952 साली बेडकीहाळ येथे स्थापन झाले आणि शैक्षणिक वटवृक्षाचे बीजारोपण झाले. हीच संस्था पुढे लठ्ठे शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तिचे केंद्रीय कार्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आले.  आज लठ्ठे शिक्षण संस्थेच्या शाखा बेडकीहाळ येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. लठ्ठे शिक्षण संस्थेमुळे बेडकीहाळचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा

  या मागणी करिता पॅंथर आर्मीचे आझाद मैदान मुंबई येथे 20 जुलै रोजी आंदोलन पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुंबई प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नव बौद्ध भूमीहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे 20  जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारी प्रमुख संतोष आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील भूमीहिंना च्या सबलीकरणाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना सुरू केली पण यंत्रणेतील असंवेदनशीलतेमुळे व जाचक अटी मुळे भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनणारी योजना म्हणावी इतकी प्रभावी ठरू शकली नाही .सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून सुद्धा भूमीहिंनाच्या योजनेसाठी शूल्लक तरतूद...

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट पुणे न्यूज एक्सप्रेस :      इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१८सप्टेंबर रोजी शहरातील सांगली रोड नजीकच्या कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह संपूर्ण परिसराची  पाहणी केली.       वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, लिचड ट्रीटमेंट केंद्र आणि बायोमिथेनेशन केंद्रा बाबतची सविस्तर माहिती दिली.   स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे  सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने आणि गुणवत्तापुर्वक रित्या सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. तसेच त्याठिकाणी अद्यापही कार्यान्वित न झालेले लिचड ट्रीटमेंट केंद्र तातडीने सुरू करणेचे आदेश संबंधित कंपनी च्या प्रतिनिधींना दिले.    यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, माहिती व ज...

नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न

 गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित  पुणे न्यूज एक्सप्रेस :  अन्वरअली शेख  देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते, यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम  यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या  त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे  मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने...

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...